
राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संक्रमण वाढत असताना विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने कोरोना संक्रमणाच्या कथित तिसऱ्या लाटेत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता विद्यार्थ्यांच्या परिक्षा व तसेच संक्रमणावर नियंत्रण आल्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी आज सरसकट शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या २४ जानेवारीपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजली जाणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षा हा आम्हाला नेहमीच महत्वाची राहीली आहे. यापुढेही शालेय विभागाकडून यावर कटाक्षाने लक्ष दिले जाईल असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
Schools in areas where coronavirus cases are fewer can restart physical classes for Std 1st-12th and also start pre-primary classes from January 24 onwards. We are committed to safe resumption of schools in the state. #BackToSchool @MahaDGIPR pic.twitter.com/MesX5SNl5L
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 20, 2022
शाळा सुरु होण्याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाला सर्व निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी तयार करण्यात आलेल्या एसओपीमध्येही बदल करण्यात आले आहेत. स्थानिक परस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. शाळेत पाठविण्यासाठी पालकांची समत्ती अनिवार्य असणार आहे. शिवाय कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य सरकारची भुमिका आहे. निवासी शाळांचा, वसतिगृहांचा आगामी काळात निर्णय घेतला जाईल. अद्याप नियमित शाळांवर निर्णय घेतला असून यामध्ये प्रीप्रायमरी शाळा सुरू करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सोबतच पहीली ते बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरु करण्यात येतील.
शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर अधिक भर देण्यात आला आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असणार आहे. तसेच १५ ते १८ वर्ष विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देणार असल्याची माहीती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात शाळा सुरु करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील शालेय संस्था, मुख्याध्यापक, शालेय अधिकारी, सीईओ, आयुक्त, कलेक्टर अशा सर्व यंत्रणेला योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.