राज्यात कोरोनाचा प्रकोप हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दि. १५ एप्रिलपासून दोनदा सरकारने कडक नियम लागू केले होते. मात्र तरिही संसर्गाचा वेग थांबला नाही. त्यानंतर आता ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज राज्य सरकारतर्फे ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, २२ एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. सदर लाॅकडाऊन हा १ मे पर्यंत लागू राहणार आहे.
सामान्यांना रेल्वे प्रवास पूर्णतः बंद
मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील.
खासगी वाहतूकीत फक्त ५० टक्के प्रवाशी
खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत. इतर सर्व कार्यालयांमध्ये ५ कर्मचारी किंवा १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे.
लग्नाला फक्त २५ जण, २ तासांत लग्न उरकून घ्या
लग्नासाठी एका हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त २ तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
एकंदरितच या नियमावलीनुसार सोशल डिस्टसिंग योग्य पालन व्हावे यासाठी पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शक्यतो विनाकारण घराबाहेर पडू नका. सर्व नियमांचं योग्य ते पालन करा.