राज्य शासनाने कोविडचा (Covid-19) वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश जाहीर केले आहेत. यातून आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आले आहे. यातून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक अंतर राखण्यासाठी उत्पादन क्षेत्रास शिफ्टमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के करण्यात आली आहे. तसेच नाट्यगृहे व सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही निर्बंध घालण्यात आले आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन सर्व खाजगी कंपन्यांना केले आहे.