टाटा कँन्सर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर अनेकांची राहण्याची अडचण होते. टाटा रुग्णालयाच्या रस्त्यांवर, आजूबाजूच्या पुलाखाली रुग्णाचे नातेवाईक दिवस काढतात. रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुंबईत राहण्याची सोय व्हावी, या उद्दात हेतूने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपुर्वीच म्हाडाकडून जागा देऊ असे आश्वासन दिले होते. त्याची घोषणा आज त्यांनी पत्रकार परिषदेत केली. म्हाडाकडून टाटा रुग्णालयाच्या ५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजी कासिम चाळ परिसरातील म्हाडाने १०० सदनिका टाटा रुग्णालयाला देऊ केल्या आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना सदनिका देण्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये यासाठी ही जबाबदारी टाटा रुग्णालय प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या निर्णयामागे मुख्यमंत्री महोदयांचे मोठे योगदान असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. तसेच सदनिकांच्या चावीचे वाटप हे कँन्सरवर यशस्वीरित्या मात केलेल्या खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री ना.जिंतेद्र आव्हाड यांनी दिली आहे. या निर्णयाचे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी आभार मानले आहेत. टाटा रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षभरात ८० हजार रुग्ण येतात. यातील ३९ टक्के रुग्ण महाराष्ट्रातून तर ६१ टक्के रूग्ण देशभरातून येतात. अनेक गरीब रूग्णांना राहण्याशिवाय गत्यंतर नसते. मात्र रुग्णांची राहण्याची प्रचंड गैरसोय होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या या निर्णयाने टाटा रुग्णालयाला मोठी मदत मिळेल व यातून अंदाजे १००० रुग्णांची सोय होऊ शकेल, असे मत डॉ. श्रीखंडे यांनी व्यक्त केले आहे.