रविवारपासून मुंबईच्या गारठ्यात वाढ झाली आहे. मुंबईत किमान तापमान थेट सहा अंशाने खाली सरकत १५ अंश सेल्सिअसवर घसरले. सध्या मुंबईकर गारेगार वातावरणाचा अनुभव घेत आहे. दुसरीकडे पाकिस्तानातून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता घरसली असून तिने सोमवारी धोकादायक पातळी गाठली. मुंबईतील हवेची गुणवत्ता ५०२ वर पोहचल्याने मुंबईसाठी रेड अलर्ट दिला आहे.
देशभरात मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेने धोक्याची पातळी ओलांडली. त्या खालोखाल पुणे आणि अहमदाबादची हवेची गुणवत्ता खराब आहे. पाकिस्तानातून निघालेले धुळीचे वादळाचा प्रभाव मुंबईत दिसून आला. याचा प्रभाव सोमवारीही कायम राहून मुंबईतील धूलीकण आणि सूक्ष्म धूलिकण या दोघांमध्ये वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता घरसली, अशी माहिती हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या सफर प्रणालीतून दिली गेली. मुंबईतील हवेतील गुणवत्ता ढासळल्याने श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी तसेच शक्यतो बाहेर पडणे टाळावे.
हवेची गुणवत्ता ढासळलेली अतिधोकायदायक ठिकाणे
बोरीवली – धूलिकण ४३८ , सूक्ष्म धूलिकण ४०९
मालाड – धूलिकण ४८०, सूक्ष्म धूलिकण ४७४
भांडूप – धूलिकण ४७८, सूक्ष्म धूलिकण ७९४
अंधेरी – धूलिकण ९९३, सूक्ष्म धूलिकण ४६०
वरळी – धूलिकण ४२३, सूक्ष्म धूलिकण ४२५
माझगाव – धूलिकण ५९०, सूक्ष्म धूलिकण ६०८
कुलाबा – धूलिकण ५४४, धूलिकण ४४६