महाराष्ट्राच्या निमशहरी भागात नवी हॉटेल इंडस्ट्री उभी राहत आहे. शहरातील रेस्टाँरंटपेक्षा काहीतरी वेगळे आणि हटके देण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात. त्यातूनच ग्रामीण-निमशहरी भागात अनलिमिटेड जेवण तसेच रावण थाळी, बाहुबली थाळी, म्हसोबा थाळी, सरपंच थाळी अशा विविध थाळयांचा नवा मार्केटिंग फंडा पहायला मिळतो. थाळी संपवली तर हॉटेलकडून ग्राहकांना बुलेट, स्कूटर सारखी महागडी गिफ्ट देण्याची जाहीरात केली जाते. या जाहिरातीमुळे का होईना पण ग्राहक अशा हॉटेलात गर्दी करतात. इतके भरपेट जेवण देऊन, त्यावर गिफ्ट्स वाटून या हॉटेल्सना नेमका नफा तरी कसा होत असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर मग आपण जाणून घेऊया हॉटेल चालकांचा या मार्केटिंग ट्रीकमागचा भन्नाट जुगाड…
समजा एखाद्या हॉटेलात दोन हजार रुपयांची थाळी खाण्याचे आव्हान दिलेले आहे. थाळी संपवल्यास गाडी किंवा इतर बक्षिसांची खैरात आहे. कुठे अमुक-तमुक रुपयांची थाळी खा आणि पूर्ण जेवण फुकट जेवा, असा पर्याय दिलेला आहे. काही हॉटेल चालक भल्या मोठ्या थाळीमध्ये सर्व पदार्थ सजवून त्याचे फोटो-व्हिडिओ काढून जाहीरात करत ग्राहकांना नवनवीन चॅलेंज देत असतात.
हॉटेल मालकांच्या या चॅलेंजमागे असते नफ्याचे गणित. लोकं अशा अक्रमचक्रम थाळ्यांची नावं ऐकून आणि चॅलेंजला पूर्ण करण्याच्या नादात हॉटेलमध्ये येतात. या थाळ्या एका व्यक्तीला संपवणे अशक्यच असते. त्याचप्रकारच्या अटी हॉटेलने थाळीसंदर्भात घालून दिलेल्या असतात. मग येणारे ग्राहक थाळी पूर्ण करू शकत नाहीत. शिवाय ग्राहकालाच थाळीचे पैसे देण्याशिवाय पर्याय उरत नाही.
हॉटेल्सची पॉलिसी ‘खाओ, जितना खाना हो’
अनलिमिटेड खाण्यासाठी हॉटेल्स इतके सारे पर्याय देतात की नेमकं काय खावं? यात ग्राहकांचा गोंधळ उडतो. अशा अनलिमिटेड हॉटेल्समध्ये प्रवेश करताच आपल्याला वेलकम ड्रिंक किंवा सुप सर्व्ह केले जाते. पाणीदार पदार्थ खाल्याने पोटातील भुकेला मोठा आधार मिळतो व आपली भूक मोठ्याप्रमाणावर कमी होते. याशिवाय आपली आवडती डीश खाण्यासाठी लोक जेव्हा तुटून पडतात तेव्हा ती डीश खावूनच अनेकांचे पोट भरून जाते. त्यामुळे पूर्ण जेवण संपविण्यात मोठी अडचण होते.
यात खाण्याचा विचार केला तर सर्वसाधारपणे एक माणूस दिवसाला दोन किलो अन्न खावू शकतो. मात्र एकाचवेळी दोन किलोपेक्षा जास्त खाणे हे कोणालाही शक्य होत नाही. एकतर पूर्ण दिवसभरात त्या व्यक्तीने काही तरी खाल्लेलं असते. त्यामुळे अनलिमिटेड जेवण एकट्याने संपवणे तरी कठीण होते.
अनलिमिटेड थाळ्यांमध्ये जेवणाऱ्या व्यक्तींवर मर्यादा असते. यामध्ये सर्वाधिक जेवणारी व्यक्ती दोन जरी धरल्या तरी उर्वरित व्यक्ती या आपल्या पोटाला लागेल इतकेच अन्न खाऊ शकतात. त्यामुळे थाळीत आलेले सर्व पदार्थ संपवण्यावर मर्यादा येते.
‘इतना पैसा मे इतनाइच मिलेगा’ बिल सिस्टीम आणि त्यामागचे प्रॉफीट
अनलिमिटेड थाळ्या असलेल्या हॉटेल्समध्ये वेटर्सची गरज जास्त भासत नाही. त्यामुळे कमी वेटर्समध्ये काम चालवून महिन्या अखेरीचा खर्च वाचवला जातो. शिवाय थाळीमधील सर्वात महागडा पदार्थ ग्राहक मोठ्या प्रमाणात खाऊ शकत नाही, असा हॉटेल्सचा विचार असतो. चॅलेंज हरल्यामुळे ग्राहकालाच बील पूर्ण भरावे लागते. शिवाय महागडी गिफ्ट देण्याची गरजच भासत नाही. त्यामुळे प्रत्येक थाळीच्या मागे हॉटेल्सच प्रॉफिटमध्ये असतं.
तसंही हॉटेलचे चॅलेंज काहीही असो. अनेक ग्राहक फक्त सहपरिवार किंवा आपल्या मित्रपरिवारासोबत फक्त खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी अशा हॉटेलात गर्दी करत असतात. फॅमिली ग्रूप्सना चॅलेंजमध्ये रस नसतो. खाण्याच्या थाळीसोबत फोटो, हॉटेलमधील सेल्फी पॉईंट, फार्महाऊस वरील हॉटेलमधील वाईब्स आनंद घेण्यासाठीही अनेक ग्राहक जात असतात. त्यामुळे फक्त मार्केटिंगसाठी महागड्या गिफ्टचा वादा हॉटेलचालकाला मात्र चांगलाच नफा देऊन जातो.