महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक बांधणीत राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजधुरीणांचे महत्त्वाचे योगदान आहे. या महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने महापुरुषांच्या चरित्र साधने प्रकाशन समित्यांची स्थापना केली होती. यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीचे पुनर्गठन करण्याचा निर्णय ३० मार्च २०२१ रोजी घेण्यात आला आहे. ‘आठवणीतले बाबासाहेब’ या ग्रंथाचे लेखक योगीराज बागूल यांची समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री समितीचे अध्यक्ष आहेत, तर या विभागाचे राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील. उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, शासकीय मुद्रणालय, लेखा सामग्री व प्रकाश विभागाचे संचालक हे समितीचे सदस्य आहेत. तर उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणेचे संचालक समितीचे निमंत्रक आहेत. तसेच साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, ज.वि. पवार, डॉ. भालचंद्र मुणगेकर, शफाअत खान, निखील वागळे, डॉ. मधुकर कासारे, एन. जि. कांबळे, रणजीत मेश्राम, डॉ. ताराचंद खांडेकर, लहू कानडे, केवल जिवनतारे, डॉ. संभाजी बिरांजे, डॉ. धनराज निळकंठ कोहचाडे, डॉ. कमलाकर प्रल्हादराव पायस आणि डॉ. बबन पंडितराव जोगदंड समितीच्या सदस्यपदी आहेत.
समितीमध्ये असलेले योगीराज बागूल यांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी”, “तमाशा- विठाबाईच्या आयुष्याचा”, “पाचट” अशी काही पुस्तके लोकप्रिय झालेली आहेत. तर ‘आठवणीतले बाबासाहेब’ या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद असलेला “Dr. BR Ambedkar : Reminiscences By His Close Associates” हा ग्रंथ अनोखी पब्लिकेशन्सने प्रकाशित केला होता.
congratulations sir