दोन चाकी वाहनांवर आता लहान मुलांनाही हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट अनिर्वाय असणार आहे. यासाठी केंद्र सरकार कडून रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले गेले आहे. या परिपत्रकानुसार, एकूण तीन बदल सुचवले गेले आहेत. यात बाईकवर बसलेल्या मुलांना सेफ्टी हार्नेस आवश्यक असणार आहे. त्यासोबतच मुलांना क्रॅश हेल्मेट पण लावणे आवश्यक असेल आणि दुचाकींचा वेग हा ४० किलोमीटरपेक्षा जास्त असू नये.
परिपत्रक नेमकं काय म्हटलयं?
नियमांनुसार, ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांना मोटारसायकलवर घेऊन जाणाऱ्यांना सेफ्टी बेल्ट लावावा लागेल. मागे बसलेल्या मुलांना क्रॅश हेल्मेट घालणे अनिर्वाय असेल. वाहनाचा वेग ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा. सेफ्टी हार्नेसची क्षमता ३० किलोग्रॅम पर्यंत वजन उचलेल इतकी असावी.
काय असतं सेफ्टी हार्नेस?
सेफ्टी हार्नेस एक प्रकारे सेफ्टी जॅकेट असतो. दुचाकी चालवणाऱ्या वाहकामध्ये आणि लहान मुलांमध्ये हा बांधला जाईल. जेणेकरून दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर लहान मुल सुरक्षित राहिल.
अतिसंवेदनशील वस्तूवाहक वाहनांनासुद्धा नवी नियमावली लागू होणार
केंद्र सरकारतर्फे आणखी एक नियम बनवला जाणार आहे. ज्याद्वारे आर्गन, नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या घातक आणि जोखीमपूर्ण गोष्टी वाहणाऱ्या वाहनांना ट्रॅकींग सिस्टम लावण्यात येईल. जेणेकरून त्यांच्या स्थितीची व स्थळाची माहिती मिळेल.
या आधी २०१९ मध्ये आले होते नवे नियम
केंद्र सरकारने या आधी २०१९ साली मोटरवाहतूक नियमन कायद्यात बदल केले होते. ज्यामध्ये ट्राफिक नियमांचे पालन न करणाऱ्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये वाढ केली होती. सीट बेल्ट आणि हेल्मेट नाही घातल्यावर आधी १०० रूपये दंड होता जो नंतर वाढवून १००० रूपये करण्यात आला होता. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना आधी २००० रूपये भरावे लागत होते ते वाढवून १० हजार रूपये करण्यात आले होते. विनापरवाना गाडी चालवणाऱ्यांना आधी ५०० रूपये असलेला दंड आता ५००० करण्यात आला आहे. तर गती मर्यादा ओलांडण्यासाठीचा दंड ५००० रूपये करण्यात आली आहे.