गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप महाराष्ट्रात सर्वदूर गाजला. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय देऊन १५ एप्रिलपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे निर्देश दिले. जर १५ एप्रिलपर्यंत संपकरी कर्मचारी सेवेत रुजू झाले नाहीत तर राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे आहे, असेही उच्च न्यायालयाने गेल्या बुधवारी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाने एकूण ३८ पानी निकालपत्र जाहीर केले आहे. मात्र विलिनीकरणाच्या अपयशानंतर आता न्यायालयाच्या ३८ पानी निकालपत्रातील १२ पाने सरकारने गायब केल्याची अफवा समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समाजमाध्यमांच्या ग्रुपमधून अफवांचा बाजार उठला आहे. ३८ पानांपैकी बाहेर आलेल्या २८ पानांवर न्यायाधीशांची सही नाही. गायब केलेल्या १२ पानांमध्ये विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या दिला आहे, असा दावा त्या अफवांमधून करण्यात येत आहे. त्यामुळे सदावर्ते बाहेर आले की १२ पाने वाचून दाखवतील, तेव्हाच आपण कामावर जायचे, अशीही पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून अशा आधारहीन असलेल्या अफवांवर रोख लावण्याची केली जात आहे.
संपकाळातील काही प्रमुख अफवा
– जे आंदोलक संपात सहभागी होतील, त्यांचेच विलीनीकरण होणार. इतरांचे नाही.
– कामावर गेल्यास संपकाळातील नुकसान भरून काढणार
– आझाद मैदानात संप करणाऱ्यांवरीलच कारवाया मागे घेतल्या जातील
– सरकारने दिलेली पगारवाढ कामावर रुजू झाल्यावर मागे घेतली जाईल
– ४५ दिवसांच्या पुढे संप वाढल्यास तो अधिकृत होतो आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो
– आझाद मैदानावरील रजिस्टरमध्ये जो स्वाक्षरी करेल, त्यालाच विलीनीकरणाचे लाभ मिळतील
ज्येष्ठ पत्रकार विलास बडे हे सुद्धा सातत्याने या एसटी आंदोलनाचा पाठपुरावा करत आहेत. त्यांनीसुद्धा समाजमाध्यमातून या अफवाप्रकरणावर पोस्ट लिहून एसटी कर्मचाऱ्यांना सतर्क होण्याचे आवाहन केले आहे.
पत्रकार विलास बडे यांची पोस्ट…
विलास बडे यांनी आपल्या पोस्टमध्ये हे सुद्धा नमूद केले आहे की, त्यांच्या कडे सदर अफवा पसरवणाऱ्याची याची देखील आहे. त्यांनी सायबर पोलिसांनाही आवाहनही केले की सदर अफवा पसरवणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी.
आता या सर्व प्रकरणानंतर एसटी कर्मचारी नक्की काय पवित्रा घेतात आणि या समस्येवर नक्की काय तोडगा निघेल, एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रूजू होतील का संपाचा पवित्रा अजून देखील कायम राहिल, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल…