कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कालच राज्य सरकारने कडक लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीची घोषणा केली. आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन सुरू होणार आहे. लॉकडाऊन जनहिताता असला तरी अनेकांना अनेक अडचणीचा सामना यामुळे करावा लागत आहे. अनेकांच्या आर्थिक अडचणी सुरू झाल्या असून कारखाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक अस्थापने बंद झाल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. हातावर पोट असणार्या समाजातील दुर्बल घटकांना व तृतीयपंथाना या गोष्टीमुळे आर्थिक चणचण भासू लागली आहे. अशा गंभीर परिस्थितीत तृतीयपंथीना कोणत्याही प्रकारची मदत होत नाही.
सततच्या अवहेलनेला सामोरे जावे लागणार्या तृतीयपंथी समाजाला आता या नव्या संकटाला तोंड दयावे लागत आहे. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करायची तरी कशी? असा मोठा प्रश्न या समाजासमोर उभा ठाकलेला दिसून येतो.
मुंबईतील शिवाजीनगर येथील बहुसंख्येने असलेल्या तृतीयपंथी वस्तीत मात्र या समस्येवर तोडगा काढल्याचे दिसत आहे. तृतीयपंथी समाजासाठी नेहमीच पुढे येणाऱ्या ‘किन्नर माँ’ या स्वयंसेवी संस्था या समाजासाठी मदतीचा हात दिला आहे.
‘किन्नर माँ’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे शिवाजीनगर येथील तृतीयपंथी व समाजातील दुर्बल घटकांना शिधावाटप करण्यात आले आहे. ‘किन्नर माँ’ संस्थेच्या अध्यक्षा सलमा खान यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणार्या अभिनव उपक्रमाचे तृतीयपंथी समाजातून फार कौतुक होत आहे.
शिवाजीनगर येथे राहणाऱ्या तृतीयपंथींना आजवर कोणाकडून कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. मात्र गेल्या वर्षभरात ‘किन्नर माँ’ ही संस्थांच त्यांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. या समाजाला ‘किन्नर माँ’ संस्था करत असलेल्या मदतीमुळे येथील तृतीयपंथींना मोठा आधार मिळाला आहे.